खोल दे पंख मेरे ,
कहता है परिंदा,
जमी नही है मंजील मेरी,
अभी पुरा आस्मान बाकी है “
या ओळी ज्यांना चपखलपणे लागू होतात असा ‘क्रेझी फ्रेड्स ग्रुप’
समाजासाठी सहजपणे शक्य असेल तर काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्यांनी काम सुरू केलं. कुठं साफसफाई, कुठं एखादा लहानसा सांस्कृतिक कार्यक्रम घे. त्यासाठी फक्त गल्लीतली चिमुकली मुलं आली तरी चालतील. कुणी मोठ्यानं यावं, खूप मोठी दाद मिळावी असं कसलिही अपेक्षा नव्हती. अन् बघता-बघता तीसेक मित्रांचा गोतावळा जमला. काही मुलं, काही मुली. काही वर्गमित्र. काही वर्गमित्रांचे मित्र. असे एकाच धाग्यातले मणी एक-एक करत गुंफत गेले आणि छोटं-छोटं कामही वाढत गेलं. ३० ऑक्टोबर २०१२ रोजी अधिकृतपणे क्रेझी फ्रेंडस् या ग्रुपची स्थापना झाली. या ग्रुपचं काम किती तरी दिवस आधीपासून सुरू होतं. त्यावर फक्त नावाची मोहोर लागली.
ग्रुप स्थापन झाल्यापासून छोट्या-छोट्या कामांची मालिका अविरतपणे सुरू आहे. ग्रुपमधील सदस्यांचं आजही कॉलेज सुरूय. कोणी इंजिनीअरिंग, कोणी एम.ए, कोणी मास कम्युनिकेशन, तर कोणी आणखी काही. जमेल तसा पैसा जमा करतात. इतकाच जमा करावा असा अट्ट्हास नाही. जितकं करायचं तितकंच, पण मनापासून ही भावना मागे दडलीय. दरवर्षी २५ डिसेंबर ते १ जानेवारीच्या काळात ‘स्प्रेड हॅप्पीनेस वीक’ साजरा केला जातो. या आठवड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मदर तेरेसा अनाथाश्रमात फळवाटप, रक्तदान शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिबिराचं आयोजन. या युवकांना रचनात्मक काम करायला नेहमीच आवडतं. महापालिकेच्या काही शाळा या ग्रुपनं निवडल्या. त्या शाळेत महिला, विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं. शहरात इतर अनेक ग्रुप समाजसेवेची छोटी-मोठी काम करतात. त्यांच्या सोबतीनं विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदान जनजागृतीच्या कामाला सुरुवात केली. ग्रुपच्या वर्धापनदिनी सावकर चौक, टिळकनगर भागात स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं. दिवाळी आली की दरवर्षी शहरात उत्साहाचा माहोल असतो. फटाक्यांची आतषबाजी होते. दिवाळीनंतरही ही आतषबाजी अनेकदा सुरू असते. यामुळे प्रचंड प्रदूषण होतं. मराठवाडा दुष्काळाच्या खाईत आहे. याला हे प्रदूषणही जबाबदार आहे. याच भान ठेवत तीन वर्षांपासून ग्रुपमधील सदस्यांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करायचा निश्चय केलाय आणि तो अंमलातही आणला. दरवर्षी टिळकनगरातील व्यंकटरमण बालाजी मंदिरात दीपोत्सव साजरा करत ग्रुपच्या वतीनं दिवाळी साजरी केली जाते. दोन वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू झाला. या वर्षी परिसरातील नागरिकच दीपोत्सवासाठी उत्साही होते. यंदाचा दीपोत्सव कधी, अशी विचारणा व्हायची आणि तो दणक्यात, जोशात, उत्साहात साजराही झाला. एक दीप पेटलाय प्रदूषण विरहित दिवाळीचा. तो फक्त इथून पुढे कायम तेवत ठेवायचा आहे.
उन्हाळ्यात बच्चे कंपनीसाठी उन्हाळी शिबिराचं आयोजन केलं जातं. या शिबिरात ओंकार, श्लोक, अॅबॅकस, चित्रकला, खेळ आदी कलागुणांनी लहानग्यांना समृद्ध करायचा प्रयत्न केला जातो. एक वर्षापासून या कामानं थोडं मोठं स्वरुप धारण केलंय. आता रोजच बच्चेकंपनीसाठी क्रेझी फ्रेंडस् ग्रुपकडून या उपक्रमाचं आयोजन केलं जातं.
समाजातील रंजलेल्या-गांजलेल्या, अनाथ , गतिमंद-मतीमंद यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी 15 ऑगस्टला क्रेजी फ्रेंड्स ग्रुप ‘रंग दे बसंती’ या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमामध्ये बालांकुरबी , भगवान बाबा बालिकाआश्रम , जिजामाता बालिकाश्रम ,योगेश्वरी बालिकाश्रम,बाबासाई एड्सग्रस्त इत्यादी आश्रम,उत्कर्ष अपंग प्रशिक्षण संस्था,इत्यादी सहभाग नोंदवतात. या कार्यक्रमात देशभक्तीपरगीत ,नृत्य डान्स,पोवाडा इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सदरीकरण केले जाते.या करिता मुलांना ट्रेनर उपलब्ध करून दिले जातात.






